माझ्या गोव्याच्या भूमीत
समुद्रराग
दिसली नसतीस तर...
चित्रवीणा
अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
रतनअबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्याजांभळ्या वस्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगानी फुलारलाच नसता
आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जीवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शद्बातून
कातरवेलची कातरता
आज अशी झिणझिणत राहिलीच नसती
अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सांद्र-मंद्र सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्या भाबड्या जनावरांची
आर्जवी हळुवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती
तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही;
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरु शकलेलो नाही
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फुलांनी
असा डवरलाच नसता
तू तेव्हा आकाशाएवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण
निराशा मला देऊन गेली नसतीस
तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
निःसंग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो
तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीसः
माझी सशरीर नियती होतीस
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो