कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Showing posts with label मिलिंद फ़णसे. Show all posts
Showing posts with label मिलिंद फ़णसे. Show all posts

Tuesday, December 2, 2008

कुजबुज

डोळ्यांतल्या दिव्यांची का तेलवात झाली ?
दोघांतल्या गुजाची जाहीर बात झाली

मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे ?
खेळात उभयतांची जिंकून मात झाली

आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे
मध्यान्हिच्या उन्हाची पौर्णीम रात झाली

खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची
हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली

जाता जवळ जरासा, रोमांचली नवोढा
धडधड अधीर, नूतन नवख्या उरात झाली

हाकी अरूण निर्दय वेगात रथ असा का
आरूढ ज्यावरी ही अरसिक प्रभात झाली ?

फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी
अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली

करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो
कुजबुज अशी फुलांची आपापसात झाली


कवी - मिलिंद फणसे

Tuesday, October 21, 2008

कधी

"हो" कधी, "नाही" कधी अन्‌ "कदाचित" ही कधी
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?

रोज माझा प्रश्न अन्‌ रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी

हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी

बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी

ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी

ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी

अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?


कवी - मिलिंद फ़णसे

Monday, June 30, 2008

प्रसाद

हा सांग का तुझा, इंद्रा, प्रसाद नाही
पृथ्वीतळी शिळांची मोजदाद नाही

जी स्पंदने सुखाची जारकर्म देई
घरच्या फळास ऐसा चोरस्वाद नाही

आमीष का सुखाचे दावतेस सखये
मी सोवळा, मला भलताच नाद नाही

केलीस दुर्गुणांची तू सखोल चर्चा
माझ्या सुधारण्याचा, का प्रवाद नाही?

दे आरशा जराशी, ओळखून हाळी
बाकी कुणास माझे नाव याद नाही

आहे तुझी परीक्षा, केशवा, खरी ही
उदरात उत्तरेच्या, गर्भनाद नाही

कवी - मिलिंद फ़णसे

Thursday, June 26, 2008

चार दिवस

फार काही मागत नाही, घेऊ नका आडकाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन पुत्र मी कुणाचा
आज्ञाधारक अन् शहाणा
नसेन भाऊ, दादा, भाचा
केवळ अलाणा-फलाणा
जरा मोकळा राहू द्या, येऊ नका माझ्या पाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन पती अर्धांगीचा
बैल जुंपलेलो घाणा
नसेन वडील मी मुलींचा
पायी झिजल्या वहाणा
जाईन गणिकेच्या कोठी अथवा संन्याश्यांच्या मठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन मित्र मी दोस्तांचा
म्हणू दे माणूसघाणा
नको कोणत्याही पेशाचा
धंदेवाईक बहाणा
मनीषा ही एक आहे, जवळ आली आता साठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

साखळदंड दायीत्वाचा
तुटे ना कितीही ताणा
अर्ज करता मी रजेचा
करता किती हो ठणाणा
मुक्त श्वास घेईन मी, सोडा सार्‍या निरगाठीं
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

भार उतरू दे डोईचा
पाठीचा वाकला कणा
देई यत्न लिहिण्याचा
सृजनाच्या सुखद वेणा
फावला तो वेळ मिळता करीन लेखनकामाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

व्यापार चारच दिवसांचा
लाख मोलाचा पण जाणा
आयुष्याच्या भैरवीचा
वाजू लागला तराणा
हिशोब मांडीत बसले चित्रगुप्ताचे तलाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

कवी - मिलिंद फ़णसे

Wednesday, June 25, 2008

कर्ज

आज चुकवून सारी देणी मोकळा मी जाहलो
ताठ मानेने जाण्या पहा मोकळा मी जाहलो

दिसताच मी फिरवून नजरा लोक झाले चालते
निर्धास्त व्हा, अद्यापही भिकेस ना मी लागलो

रंग सरड्यासम बदलते रक्त तुमचे मतलबी
उकळत्या रक्तास माझ्या आटवून मी चाललो

तुम्हीच होता कापला हळुवार हातांनी खिसा
स्पर्श सारे चोरटे आता ओळखू मी लागलो

नाही दिलासा आज कोठे तरीही मस्तीत मी
मिंधेपणाच्या जगण्यास ठोकरून मी चाललो

द्रव्य लाविले पणाला, कुलशील नव्हते सोडले
जुगार अब्रुचा खेळणारा धर्म ना मी जाहलो

कशास येणे फिरुन येथे, वनवास बरवा ह्यापरि
व्यापार हरलो भावनांचा, नादार मी चाललो

ओलांडणे न वेस अंतिम कर्ज मागे ठेवूनी
फेडून आज सव्याज सर्व अपमान मी चाललो

मानवली नाही, लोकहो, गावची तुमच्या हवा
प्रत्येक घरच्या तक्षकाला परीक्षित मी भासलो

कवी - मिलिंद फ़णसे

Thursday, June 12, 2008

कैद

रमला न जीव येथे, कोणा लगाव नाही
वेल्हाळ माणसांना येथे उठाव नाही

गर्दी अनोळख्यांची वाटे हवीहवीशी
नजरेत घोळक्याच्या कावा, बनाव नाही

सामान्य लोक आले, असहाय्य पाहुनी मज
जे नामवंत होते त्यांचाच ठाव नाही

गर्भार मेघमाला, आषाढमास दाई
का कोंडल्या जळाला तरिही बहाव नाही

कैदेत शैशवी मी, कैदेत यौवनीही
बाहूत बंधनांच्या मुक्तीस वाव नाही

वात्सल्यकैद सरता, तारुण्य इंद्रियांचे
फेरा अखंड चाले, मरुनी बचाव नाही

मी आळवू पहातो बाल्यातला सुरांना
ओठांस भैरवीचा अजुनी सराव नाही

गणगोत, धर्म, जाती, ही जन्मजात वसनें
आत्म्या, निलाजरा तू, तुज पेहराव नाही


कवी - मिलिंद फ़णसे

Tuesday, June 10, 2008

सावल्या

मिट्ट काळोखात होत्या गूढ काही सावल्या
भूतकाळातील पापांच्या उशाशी सावल्या

जागतो सैतान देही आज कोणा पाहुनी
चेहऱ्याला नाव होते, या निनावी सावल्या

गाडले होतेस ज्यांना खोल तू अपुल्या मनी
त्या भुतांच्या खेळती आता जिवाशी सावल्या

जोडले नाते तनुशी कालपावेतो जरी
या निघाल्या आज करण्या बेइमानी सावल्या

जीवनाचे सत्त्व सारे शोषले जळवांपरी
जीव माझा घेउनीही का उपाशी सावल्या

काय तृप्तीच्या बढाया मारता माझ्यापुढे
पोटभरल्या माणसांच्याही अधाशी सावल्या

शाप त्यांना, सांग, कोणी हा विदेहाचा दिला
मांडती दावा उभा बघ इंद्रियांशी सावल्या

कवी - मिलिंद फ़णसे

Thursday, June 5, 2008

काटे

माझ्यावरीच केवळ हे भाळलेत काटे
वा काळ होउनी हे सोकावलेत काटे

म्हटले गुलाब टाळू, टाळू मजेत काटे
जाईजुईतही पण बोकाळलेत काटे

लिहिलीत प्रेमपत्रं रक्ताळल्या करांनी
मार्गातुनी सखीच्या मी वेचलेत काटे

करता गुन्हा जरासा सुमनांस स्पर्शण्याचा
दुमडून अस्तन्यांना सरसावलेत काटे

केली न मी फुलांशी त्यांची जरी चहाडी
जखमा करून आता संकोचलेत काटे

केले मला फुलांनी घायाळ एव्हढे की
लाजून शुश्रुषेला सरसावलेत काटे

हसुनी फुलं म्हणाली उमलून सांजकाली
नाही, मिलिंद, धोका, सुस्तावलेत काटे


कवी - मिलिंद फ़णसे

Wednesday, June 4, 2008

आघात

शिकविलेस जे गाणे मला अजूनही मी गात आहे
षडज पेलला नाही जरी लयीत मी निष्णात आहे

नखशिखान्त तू लावण्यमूर्त लाजभारे वाकलेली
तनुलतेस जो येई सुगंध कोणत्या पुष्पात आहे

सुखमयी अशा या वेदना अजाणता देऊन जाशी
उमलत्या कळीचा, साजणी ग , कोवळा आघात आहे

जवळ तू तरीही बोललो न गूज कानी प्रेमिकांचे
बहरलीस तू, मी कैद मात्र वादळी मेघांत आहे

मृदुल मोरपंखी स्पर्श हा ईमान डोलावून जाता
वचनबध्द मी राहू कसा ग, खोट ही रक्तात आहे


कवी - मिलिंद फ़णसे

Monday, June 2, 2008

ओहळ

कापले जे दोर मागे, सांग बांधले कसे
तोडले नाते कधीचे, जात सांधले कसे

आपल्या प्रेमास साक्षी चंद्र, सूर्य, तारका
वेगळे झाल्यावरी देतात दाखले कसे

जीव ओवाळून आता शोधिसी निरांजने
तेवती डोळ्यांत ज्योती, अश्रु दाटले कसे

वासनांचा पूर गेला, प्रीत शेष राहिली
होम देहाचा करोनी कार्य साधले कसे

माग घेता आसवांचा भेटली सुखं जुनी
आठवांच्या ओहळाने मैल कापले कसे


कवी - मिलिंद फ़णसे

Tuesday, May 27, 2008

पराभव

सुर्यास काजव्यांनी पराभूत केले
वा सांज सावल्यांनी पराभूत केले

वैरी कुणी दिसेना रणी झुंजताना
माझ्याच सोयर्‍यांनी पराभूत केले

पापास दंड नाही पुराव्याअभावी
नीतीस कायद्यांनी पराभूत केले

भेटीत हार माझी न झाली कधीही
नुसत्याच वायद्यांनी पराभूत केले

संन्यास घेत होतो, परावृत्त केले
त्या एक चेहर्‍यानी पराभूत केले

नाही जुमानली मी कुणाचीच आज्ञा
पण मूक आसवांनी पराभूत केले

माझे मला कळेना जगावे कसे ते
ह्या पेटल्या मढ्यानी पराभूत केले

ओलीस ठेवले वेदमंत्रास त्यांनी
धर्मास कर्मठांनी पराभूत केले

डोही उपासनेच्या बुडी घेत होतो
नाठाळ यौवनाने पराभूत केले

याहून काय मोठी गुरूदक्षिणा की
उस्ताद शागिर्दानी पराभूत केले

अकरा अक्षौहिणी सैन्य दुर्योधनाचे
नि:शस्त्र सारथ्यानी पराभूत केले


कवी - मिलिंद फणसे

Tuesday, April 22, 2008

नेपथ्य

का असे निरंतर आयुष्याचे होते ?
माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते !

वेचता विखुरले तुकडे जगतो मरतो
हे असेच का हो स्वप्नबघ्याचे होते ?

लागते वळाया नजर सारखी मागे
तेव्हाच बारसे वार्धक्याचे होते

कुंचला कशाला दिलास तू डोळ्यांना ?
भलतेच रंगले चित्र उद्याचे होते

सोडता सुटेना मोहमार्ग माझ्याने
चोरटे प्रलोभन पण दिव्याचे होते

जर राग, लोभ अन् मोह असे स्वर्गीही

मग कशास अवडंबर पुण्याचे होते ?

वेगळा तसा पृथ्वीहुनी फार न स्वर्ग

असलेच फरक तर नेपथ्याचे होते


गझलकार -

Wednesday, March 26, 2008

इथे न कोणी

तुझ्यासारखे , तुझ्याप्रमाणे इथे न कोणी
तुझे आमच्यापरी दिवाणे इथे न कोणी


दुरावा नको, नकोच आता सलज्ज सबबी
पुरे, लाडके, तुझे बहाणे, इथे न कोणी

असे औटकाळ यौवनाची मिरासदारी
वसंतात का उगी रहाणे ? इथे न कोणी !

नवा खेळ हा, नवीन अनुभव मिळून घेऊ
मध्ये रोखण्या जुने-पुराणे इथे न कोणी

फुलू देत बेलगाम ज्वाळा तनामनाच्या
पुरे धुमसणे, विझून जाणे, इथे न कोणी !

निशा घालवू नकोस तू बोलण्यात वाया
किती घ्यायचे तरी उखाणे, इथे न कोणी !

बघायास तुज निरभ्र झाले अधीर डोळे
कशाला असे सचैल न्हाणे, इथे न कोणी


Thursday, February 28, 2008

पानगळ

गावेसे वाटते गीत माणसांचे
शोधू कोठे खरे सूर ते कळेना

आज्ञाधारक कधी शब्द दास होते
प्रतिभा त्यांची आता बटिक पाहवेना

आधी हुंकारही शब्दरूप होई
आता शब्दांतही अर्थ आढळेना

झाली कविता जसे डोह मृगजळाचे
जीवन आभासमय प्यावया मिळेना

अर्थानर्थातला काव्यप्रांत धूसर
शब्दारण्यातुनी मार्ग सापडेना

अमुच्या ह्या मैफिली काव्यकाजव्यांच्या
अंधाऱ्या अंतरी ज्योत पोहचेना

नाही आक्रोश ना भावचित्र हळवे
आहे कारागिरी, सत्य हे लपेना

कवितेचा बाज अन्‌ साज ल्यायलेल्या
ओळी वारांगना ज्या हृदी वसेना

तावांची पानगळ 'भृंग' फार झाली
सरला लेखनबहर परतुनी फिरेना


कवी - मिलिंद फ़णसे

Tuesday, February 26, 2008

वणवा

जोगवा मी वेदनेचा मागतो आहे
जीव पाषाणावरी मी लावतो आहे

होय, सर्वांशी जरी ती बोलते हसुनी
स्वर्ग सूताने तरीही गाठतो आहे

तीच फुंकर घालते अन्‍ तीच मग पुसते
"रात्रभर वणवा कशाने पेटतो आहे?"

वाहते निष्ठाफुले चरणी दुज्याच्या ती
अन्‍ उरी निर्माल्य मी कवटाळतो आहे

व्यसन दु:खाचे मला आहे असे जडले
भंगण्यासाठीच हृदया सांधतो आहे

काय त्या हृदयास जपणे ती जिथे नाही?
रिक्त गाभारा जणू सांभाळतो आहे

मार्ग जेव्हा वेगळे झालेत दोघांचे
पारिजाताचा सडा का सांडतो आहे?

कोरडे डोळे निरोपाच्या जरी वेळी
चेहऱ्याला मेघ पण आच्छादतो आहे


गजलकार - मिलिंद फणसे

Monday, February 18, 2008

सत्यशोधन

आडून पापण्यांच्या तिरपा तपास आहे
डोळ्यात रंगलेला रजनीविलास आहे

दारात कल्पनांच्या असलो जरी भिकारी
शब्दांत मात्र माझी मोठी मिजास आहे

येथेच रोषणाई भोगून घे, नटा, तू
पडताच काळपडदा अज्ञातवास आहे

बोले इमान जैसे फटकार आसुडाचे
विश्वासघातक्यांची वाणी मिठास आहे

बांधावयास तिरडी जमली अलॊट गर्दी
हर एक मित्र त्याचा मुडदेफरास आहे

कवनात रंग माझ्या शोधू नका गुलाबी
हा सत्यशोधनाचा माझा प्रवास आहे

होते अनेक शत्रू जेव्हा जिवंत होता
आता अजातशत्रू, मयता, प्रवास आहे

येईल लेखणीला केव्हा तरी सफाई
इतकाच वर मला दे, इतकीच आस आहे


गज़लकार - मिलिंद फ़णसे

Thursday, January 31, 2008

जेहत्ते कालाचे ठायी

काय द्यावा हात हल्ली माणसांना
स्वार्थ दिसतो यात हल्ली माणसांना

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
माणसे खातात हल्ली माणसांना

सहज केसाने गळा कापून जाती
सहज जमतो घात हल्ली माणसांना

पाहती दिड्‍.मूढ सारे साप-अजगर
टाकताना कात हल्ली माणसांना

पाहिजे सारेच ताबडतोब आणिक
पाहिजे फुकटात हल्ली माणसांना

भेट होते जालनावांचीच केवळ
चेहरे नसतात हल्ली माणसांना

'भृंग', देवांचे कसे होणार आता
माणसे भजतात हल्ली माणसांना


Monday, January 28, 2008

व्यथा

मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे व्यथा
त्यांसही तू माफ केले ही खरी आहे व्यथा

वाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला
काननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा

जुलुम आहे कोरडे हे वागणे, साकी, तुझे
त्यावरी हे रिक्त पेले ही खरी आहे व्यथा

लोकहो, पुसता कशाला प्रांत माझा कोणता
देश येथे फाटलेले ही खरी आहे व्यथा

जहर टीकेचे जनांच्या रिचवले असतेच मी
वाचल्यावाचून गेले ही खरी आहे व्यथा


गझलकार -

Wednesday, January 16, 2008

मृगजळ

प्रत्येक शर्यतीचा मी भाग होत गेलो
हर एक मृगजळाचा मी माग घेत गेलो

मोडीत काढली ती तत्त्वे जुनाट सारी
बहुमोल दागिन्यांना मी डाग देत गेलो

दु:खात काय मोठे, ते रोजचेच आहे
घेऊन मी सखीसम त्याला कवेत गेलो

टीकास्त्र सोडणारे जमले किती शिखंडी
अर्जुन कुणी नसावा ह्या वंचनेत गेलो

जा वैषयिक सुखांनो, शोधा नवीन गात्रे
चिरकालच्या सुखाच्या आता गुहेत गेलो

मस्तीत जीवनाला मी कुर्नीसात केला
मृत्यूस भेटण्याही मोठ्या मजेत गेलो

ह्या कागदी फुलांच्या सोडून, 'भृंग', बागा
स्वप्नातल्या कळीचा मी शोध घेत गेलो

कवी - मिलिंद फ़णसे

Monday, January 7, 2008

घे तुझ्या बाहूत...

घे तुझ्या बाहूत शीतल, त्या जगी पोळून आलो
दे विसावा माय गंगे, राख मी होवून आलो

ही न वसने आवडीची, क्लेशदायक बंद ज्यांचे
रेशमाचे पाश ज्याचे वीण ती उसवून आलो

साथ अंबर, साथ तारे जे अनंताचे इशारे
मर्त्य, चकव्या सोबत्यांची साथ मी सोडून आलो

स्फुंदणाऱ्या लेखणीला सत्य हे सांगू कसे की
कोरडी झालीस तू अन् मी रिता होवून आलो

शब्दही देती दगा का, भृंग, ब्रह्मास्त्राप्रमाणे
शाप कोणा भार्गवाचा का शिरी घेवून आलो ?

कवी -