अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.
कविता शोध
आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/
Friday, March 13, 2009
मावळत्या दिनकरा
जोडुनि दोन्ही करा |
जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा |
उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा |
आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा |
प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा |
कवी - भा.रा.तांबे
Saturday, September 20, 2008
मरणांत खरोखर जग जगते
अधीं मरण अमरपण ये मग ते
अनंत मरणे आधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारील मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते
सर्वस्वाचे दान आधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरी
रे! स्वयें सैल बंधन पडते
स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते?
सीता सति यज्ञीं दे निज बळी
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते
यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते
प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते?
कवी - भा.रा.तांबे
Wednesday, September 10, 2008
या बाळांनो, या रे या
लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया
खळखळ मंजुळ गाती झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसही गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया
कवी - भा. रा. तांबे
Friday, August 22, 2008
जन पळभर म्हणतील, हाय हाय!
मी जातां राहील कार्य काय ?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?
मेघ वर्षतील, शेतें पिकतील,
गर्वानें या नद्या वाहतील,
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?
राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ?
अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ?
कवी - भा. रा. तांबे
Wednesday, July 23, 2008
सायंकाळची शोभा
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्यांचे
अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.
झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!
पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?
कवी - भा. रा. तांबे
Wednesday, May 7, 2008
कळा ज्या लागल्या जीवा...
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.
नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.
कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.
पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !
कवी - भास्कर रामचंद्र तांबे