कविता शोध

माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.

आता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)
मीऽच तो...
http://meechto.blogspot.com/


Friday, February 27, 2009

चूक

क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!


कवी - सुधीर मोघे

Thursday, February 26, 2009

हसलो म्हणजे...

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.

हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही.

हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते;
हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही.

हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे;
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.


कवी - संदीप खरे

Wednesday, February 25, 2009

सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!


कवी - विंदा करंदीकर

Tuesday, February 24, 2009

मी

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे

कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!

कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी... कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!


कवी - विंदा करंदीकर

Monday, February 23, 2009

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!


गझलकार - सुरेश भट

Friday, February 20, 2009

यार हो

सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो

ते सुखासीन संताप गेले कुठे
हाय, जो तो मुका बैसला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो

जे न बोलायचे तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला यार हो

सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हुंदकाही नसे आपला यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो

आज घालू नका हार माझ्या गळा
(मी कुणाचा गळा कापला यार हो)


गझलकार - सुरेश भट

Thursday, February 19, 2009

जाणता राजा

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥


समर्थ रामदासांनी छत्रपतींस लिहीलेल्या पत्रातून...

Wednesday, February 18, 2009

साफसाफ

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!


गझलकार - सुरेश भट.

Tuesday, February 17, 2009

जानवी

सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना-
"मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना!"

आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी
या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना?

आली नव्या जगाची आली पहाट आली
आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना!

येती जरी समोरी सारे नकोनकोसे
मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना

साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी
गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना!

प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे
ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना!


गझलकार - सुरेश भट.

Monday, February 16, 2009

मनातलीचे श्लोक

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे,
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे.

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे,
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे.

नको वाटते वाट ह्या पावलांना
नको हालचाली... तनाच्या... मनाच्या,
नकोसे शुभारंभ ध्येया - भियाचे
नकोशाच गप्पा आता सांगतेच्या...

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे, न वाहे उरातुन श्वास,
उरा - अंतरातुन यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा... किंवा तो ही भास!

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची,
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची.

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो,
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो.

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे,
मला तू न दिसशी परंतू तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे.

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी तुझ्याशी दुरावा,
किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा.


कवी - संदीप खरे

Friday, February 13, 2009

प्रेमात पडलं की असंच व्हायचं

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं
अचानक स्वप्नात दिसणं !

खटयाळ पावसात चिंब न्हायचं
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो

आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर,
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली

माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते
अखेर ती उगवते !

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही,
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं, तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी
तिच्यासोबत भुलत जायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


एकच वचन
कितीदा देतो आपण
एकच शपथ कितीदा घेतो आपण ?

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात;
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


कवी - मंगेश पाडगावकर

Thursday, February 12, 2009

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं…

तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ,बिंडा किती ?
याचा मान , त्याचा पान
सगळा मामला रोख होता ,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं ,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

मग एक दिवस,
चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं


कवी - मंगेश पाडगांवकर

Wednesday, February 11, 2009

कसे सरतील सये

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फ़ुलं दोन रोज राती डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

कोण तुझ्या सौधातून ऊभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फ़ुलं दोन ...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया आबोलीची फ़ुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना

गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...


कवी - संदीप खरे

Tuesday, February 10, 2009

नसतेस घरी तू जेंव्हा

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो.

नभ फाटून वीज पडावी
कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो.

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो.

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो.

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा,
समचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो.

ना अजुन झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो,
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो.


कवी - संदीप खरे

Monday, February 9, 2009

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं,
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं.

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं.


कवी - अभिजीत दाते.

Friday, February 6, 2009

पाऊस

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा,
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची,
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा,
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही


कवी - संदीप खरे.

Thursday, February 5, 2009

तुमचं काय गेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?


त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?


कवी - मंगेश पाडगावकर

Wednesday, February 4, 2009

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !

आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !

दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !


कवी - मंगेश पाडगावकर

Tuesday, February 3, 2009

ती फुलराणी

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !


कवी - बालकवी

Monday, February 2, 2009

देतां घेतां

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.

असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.


कवयित्री - इंदिरा संत